Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी माणसा, भिऊ नकोस "मी" तुझ्या पाठीशी आहे...

मराठी माणसा, भिऊ नकोस
, मंगळवार, 26 मे 2020 (07:41 IST)
आपण जवळ जवळ दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये अडकलो आहोत. गेली दोन महिने आपण आपल्या मित्रांची तोंडे सुद्धा पाहिलेली नाही.

मी माझ्या काही कलाकार मित्रांशी अधूनमधून फोनवर बोलत असतो. आम्ही सगळे नाटकवाले म्हणून आमची ओळख. बरेचसे कलाकार हे व्यावसायिक मंचावर लहान मोठी भूमिका करणारे आहेत. म्हणजे त्यांचं हातावर पोट आहे. दोन महिने मिळकत शून्य. काय करायचं कसा घरचा खर्च भागवायचा? काही कळत नाही... काही मित्र अगदी खचून गेलेत. ही अवस्था केवळ कलाकारांचीच नव्हे तर प्रत्येक माणसाची हिच अवस्था आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील लोक आज खचले आहेत. माझी काय वेगळी परिस्थिती नाही. मी लेखक असल्यामुळे हातावर पोट. रोजचं अन्न रोज मिळवावं लागतं. गेली दोन महिने अन्न मिळवलंच नाही. पण जी काही थोडू फार बचत केली होती त्यातून सध्या भागवतोय, त्यात भाड्याच्या घराचं राहत असल्यामुळे घर भाडं द्यावं लागणार. तिथे नो आरक्षण... पण करायचं काय सांगा? काही करु शकत नाही. म्हणून खचून जाण्यापेक्षा उद्याच्या उमेदीची स्वप्ने रंगवणे जास्त श्रेयस्कर आहे. आता आपल्याला एकच गोष्ट वाचवू शकते... ती म्हणजे आशा...
 
एक कथा सांगतो... एक नास्तिक माणूस होता. म्हणजे नास्तिक माणूस परवडला, पण ही काहीतरी वेगळीच भानगड. कशावरच विश्वास नाही या माणसाचा. प्रत्येक गोष्टीत हा कारण शोधत असे. इतकचं काय तर प्रेम म्हणजे सुद्धा खोटेपणा आहे, असं याचं मत. कारण प्रेम निश्वार्थ असतं असं म्हणतात. पण याचं म्हणणं असं की कोणतही नातं निस्वार्थी नसतं. भावना या शब्दाचा त्याला तिटकाराच होता. तरीही याचं लग्न झालेलं होतं. कसं जमलं कुणास ठाऊक. पुर्वी याची परिस्थिती खुप चांगली होती. पण हल्ली कुणाची नजर लागली कुणास ठाऊक? पैसा टिकत नसे, पत्नी सतत आजारी, याचीही तब्येत अधून मधून बिगडत असे. होतं नव्हतं सगळ गेलं. धंद्यात तोटा झाला. बायको नेहमी सांगायची एखाद्या ज्योतिषाला किंवा महाराजांना भेटूया. पण नाही म्हणजे नाहीच. त्याच दरम्यान त्यांच्या गावात एक मोठे सुप्रसिद्ध साधू महाराज आले होते. बायकोने हट्टच धरला की महाराजांना भेटायला जाऊया. हा काही ऐकायला तयार नाही. अखेर बायका नेहमी जे अस्त्र वापरतात ते तिनंही वापरलं. अश्रूंचं अस्त्र. या अस्त्र पुढे त्याला नमावेच लागले. स्त्रीच्या अश्रूसमोर नेपोलियन सारख्या महान योद्ध्याची तलवारही गळून पडली आहे. हा तर साधा माणूस. ते महाराजांकडे आले. महराजांनी त्यांच्याकडे स्मीत हास्य केलं. त्याच्या बायकोने सारं गार्‍हाणं सांगितलं. तो मात्र महाराजांकडे कुचेष्टेने पाहत होता. महाराजांनी त्यांना एक पेटी दिली आणि म्हटलं. ही पेटी जोपर्यंत बंद आहे. तुम्हाला कोणतेही संकटं शिवू शकणार नाही. पुर्वीचे वैभव परत येईल. पण जर ही पेटी उघडली तर मात्र विनाश होईल. त्याने महाराजांसोबत वाद घातला, त्यांना पाडून बोलला. पण पत्नीने समजवले, तसा तो नाइलाजाने शांत झाला. त्याचा महाराजांवर मुळीच विश्वास नव्हता. त्याचा कर्तृत्वावर विश्वास होता. पण त्याची सर्व आशा मरुन गेली होती. ते घरी आले. पत्नी ती पेटी देवघरात ठेवली. पण त्याला मात्र फार उत्सुकता लागून राहिली, नेमकं काय असेल या पेटीत? तो महाराज मुर्ख तर बनवत नसेल ना? कधी या कशीवर तर त्या कुशीवर तो पहुडल्या पहुडल्या विचार करत होता. तिला मात्र शांत झोप लागली होती. एका क्षणी तो झपाटल्या सारखा पटकन उठला आणि देव घरात गेला. तसा तो तिथे कधी जत नसे. बायकोच्या हट्टापायी त्याने देव घरात ठेवायला परवानगी दिली होती. पण तो नेहमीच देवाची टिंगल करत असे. तो देवघरात आला व त्याने ती पेटी हातात धरली. महाराजांनी सांगितलं होतं की पेटी उघडू नये. पण त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. का कुणास ठाऊक त्याला घाम फुटला होता. त्याने पेटी उघडली, पेटीत कोंडलेला प्रकाश एकाएकी त्याच्या डोळ्यावर पडला. त्यामुळे त्याला समोरचं काहीच दिसेना. पेटीसोबत काही आकृत्याही बाहेर पडताना त्याला पुसटश्या दिसल्या. त्या आकृतींनी त्याच्या शरीराला विळखा घातला. पेटी त्याच्या हातातून खाली पडली. त्याला वेदना असह्य झाल्या. तो ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून बायको जागी झाली. ती धावतच देवघरात शिरली. तर तो खाली पडला होता, त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. पेटी त्याच्या बाजूल होती. तिनं थरथरत त्याला स्पर्श केला. तो तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण तिला काहीच कळत नव्हत. फक्त तो पेटीबद्दल काहीतरी सांगतोय एवढंच कळलं. वाईट आकृत्या थैमान घालत होत्या. तिच्या काळजात चर्र झालं. तिनं पेटीमध्ये पाहिलं. पेटीतील वाईट शक्ती मोकळ्या झाल्या होत्या. पण पेटीत अजून कुणीतरी होतं. कोण आहे? हे जाणून घ्यायला तिने निरखून पाहिलं. तर पेटीत "आशा" घुसमटून पडली होती.
 
म्हणून आशा माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पाडते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण मराठी आहोत... आपलं रक्त जे आहे ते शिवाजी-सावरकरांचं रक्त आहे. मी तर नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे छत्रपती होते. आपल्यातल्याच काही कर्मदरीद्री मराठी माणसांचा पांचटपणा नडतो आणि शिवरायांना आपण महाराष्ट्राच्या कुंपणात कोंडून ठेवतो. मी तर एक पाऊल पुढे ठेवून म्हणेन की शिवराय हे जगाचे छत्रपती होते. कारण शिवराय म्हणजे काय तर सुशासन, शिस्त, भ्रष्टाचार मुक्त शासन, विश्वबंधुत्व... मग मला सांगा हे जागतिक तत्व नाही का? आपण ऍलेकझेंडर, नेपोलियन चवीने चघळत असतो कारण त्या लोकांनी त्यांच्या महापुरुषांवर समुद्र बंदी घातली नव्हती. आपण मराठी माणूस मात्र बेड्यांत अडकलो... शिवरायांना आपण आधी जातीत वाटून टाकलं, मग प्रदेशात वाटून टाकलं आणि सावरकरांचा आम्ही कधी सन्मानच केला नाही किंवा अपमान करणार्‍यांच्या विरोधात पेटून उठलो नाही. उलट सावरकरांचा अपमान करणार्‍यांचे वळू बनून मान हलवत राहिलो... हे मराठी माणसाचं दूर्दैव आहे, हा मराठी माणसाचा करंटेपणा आहे. आपण नेल्सन मंडालेंचं गुनगान गातो. पण आपल्याला सावराकरांचा भला मोठा नि भयानक कारावास दिसत नाही... आपल्याला शिवरायांचा आग्र्यातला बंदिवास (खरंतर आग्र्यावर स्वारी) दिसत नाही. हे आपलं दूर्दैव आहे. पण तरी सुद्धा सुदैवाने मराठी माणसात जे रक्त वाहतंय ते शिवाजी-सावरकर रक्तगटाचं आहे. हे दोन महापुरुष असे आहेत जे सतत संकटातच राहिले... संकट म्हणजे जीवावर बेतणारं... केवळ तुमच्याच नव्हे तर तुमच्या कुटुंबाच्या जीवावर बेतणारं... तरी सुद्धा दोघंही खचले नाही. शिवराय आग्र्यात अडकले होते पण त्यांच्या कर्तृत्वाने ते सुटले... शिवराय पन्हाळगडावर अडकले होते... आजच्या भाषेत तो एकप्रकारचा लॉकडाऊनच... तिथूनही ते सुखरुप सुटले... सावरकर अंदमानात अडकले होते, तोही भयाण लॉकडाऊन... तिथून ते सुटले... आपल्या लॉकडाऊनची आणि शिवरायांच्या व सावरकरांच्या लॉकडाऊनची तुलना करता येत नाही.... आपण कॅल्क्युलेटेड रिस्कमध्ये जगतोय... हे दोन महापुरुष मात्र भयाण रिस्कमध्ये होते पण ते भयाण रिस्क त्यांनी कॅल्क्युलेट केलं होतं...  
 
मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? मित्रांनो हेही दिवस जातील... शनी महाराज स्वतःच्या घरात आले असं म्हणतात. जणू जगावर साडेसाती लादली आहे. असो... साहित्यातला अलंकार म्हणून ठीक आहे पण आपण उगाच ज्योतिष शास्त्रात उडी नको मारायला... मला माहिती आहे माझे अनेक मित्र कठीण जीवन जगतायत... माझीही काही वेगळी परिस्थिती नाही. पण आपण मराठी माणूस आहोत... ज्यावेळी देश अत्याचारी आक्रमकांसमोर लोटांगण घालत होता. त्यावेळी एक शिवाजी भोसले नावाचा मराठी (खरंतर मिसिरडं न फुटलेलं पोरगं) माणूस पेटून उठला होता मित्रांनो... ते शिवाजी तत्व आज आपल्या धमन्यांमध्ये सळसळतंय... आपल्यातला "मी" म्हणजे शिवाजी... मित्रांनो जगात साम्राज्यवाद्यांनी हैदोस घातला होता तेव्हा या साम्राज्यवादाला फोडून काढण्यासाठी विनायक दामोदर सावरकर नावाचा एक मराठी माणूस (पुन्हा मिसिरडं न फुटलेलं पोरगं) पेटून उठला होता... या मराठी माणसाने केवळ भारतातल्याच नव्हे, केवळ देशातल्याच नव्हे तर जगातल्या क्रांतिकारकांना प्रेरणा दिली होती. इंग्रज त्यांना डेंजरस एनिमी मानायचे मित्रांनो... महायुद्धात जगामध्ये साम्राज्यवादाविरोधात जे क्रांतिकारक आवाज उठवत त्यांच्याकडे १८५७ चे स्वातंत्र्यसमर या सावरकर लिखित पुस्तकांच्या प्रती सापडल्या... ही आहे मारठी माणसाची ताकद... आपल्यातला जो "मी" आहे तो सवरकरांचा "मी" आहे मित्रांनो.. मग आपल्याला शिवाजी-सावरकर तत्व लाभलेलं असताना आपण रडायचं कशाला? आपण लढायचं.... आता अमराठी लोक महाराष्ट्र सोडून जात आहेत. कित्येक वर्षांनंतर उत्तर प्रदेशला एक कर्ता व स्वाभिंमानी मुख्यमंत्री लाभला आहे. त्यांनी महाराष्ट्र विरोधी स्टेटमेंट केलं आहे. यावरुन मराठी माणसाला राग येणे स्वाभाविक आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीही अशीच टिका केली होती. ते आपल्या महराष्ट्राला नाकर्ते सरकार लाभल्यामुळे. महाराष्ट्रातून आपण मजूर वा नागरिक नव्हे तर कोरोना पाठवत आहोत. असो... पण योगी किंवा सिंह यांच्यावर टिका करण्यापेक्षा आपण याकडे संधी म्हणून का पाहू नये?
 
तुम्हाला राग येणे स्वाभाविक आहे पण हा राग तुम्ही ज्यांना भैय्या म्हणते त्यांच्याविरोधात किंवा पंजाब्यांविरोधात दाखवण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये घुसलेल्या ड्युप्लिकेट मी विरुद्ध राग दाखवला तर? आणि आपल्यातला खरा "मी" म्हणजे शिवाजी-सावरकर तत्व जागवलं तर? शिवाजी-सावरकर तत्व म्हणजे Being Opportunist... दोन्ही महापुरुष Opportunist होते. शिवराय सरदाराच्या घरी जन्ला आले म्हणू छत्रपती नाही झाले मित्रांनो... ते स्वतःच्या बळावर छत्रपती झाले. आजकाल प्रयेक राज्यात एका आणि देशातही एकाच कुटुंबाची चाकरी करण्याच अप्रभात आहे,. त्यांना शिवराय-सावरकर व कर्तृत्व कळने अशक्यच आहे. एक सामनय माणूस मुख्यपंत्री कसा होत व नंतर पंतप्रधान कसा होतो हे कळणं म्हणजे टकल्यावर केस येण्यासारखं आहे. असो.
 
छत्रपती शिवानी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली देणगी आहे. आपण त्यांच्याच प्रांतात जन्माला आलो आणि त्यांचीच भाष बोलतोय... मराठी माणसाने खचून जाण्यापेक्षा ही नवी संधी शोधली पाहिजे. जय पराजय होत राहतं. पण प्रयत्नार्थे परमेश्वर हे का विसरुन चालेल? जिंकलो तर जिंकलो, मेलो तर मेलो.. अरे पण लढलो ना... हे काय महत्वाचं नाही का? सदाशिवरावभाऊ लढलेच ना? ते मागे फिरले असते तर आज हिंदुस्तान साबूत राहिला असता का? विश्वास म्येला पानितप्यात... पन आम्हासनी जिंदगानी द्येऊन ग्येला की... स्वधर्म द्येऊन गेला की... लढण्याची उम्येद द्येऊन ग्येला की... कशापाशी विश्वास म्येला पानपतात ही नकारात्मक म्हन म्हनत र्‍हायची?
 
मराठी माणसाकडे शिवाजी-सावरकर हे वैभव आहे. हे तत्व म्हणजे आपल्यातला "मी"पणा... संत व सज्जन म्हणतात की मीपणा करु नये पण हा "मी"पणा स्वतःसाठी आणि समाजासाठी उपयुक्त आहे... आपल्यामध्ये शिवाजी आणि सावरकरांचं रक्त दौडतंय... आपल्यातला मी अनादी आहे, अनंत आहे, अवध्य आहे... हा "मी" पणा दैवी आहे, वैश्विक आहे... प्राकृतिक आहे नि तो परमेश्वराच्या अंश आहे... म्हणून मराठी माणसा घारु नकोस, "मी" तुझ्या पाठीशी आहे...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूर जगातील सर्वांत उष्ण शहरांत आठवा क्रमांकावर